विशाळगड हिंसाचाराचे प्रकरण हे महाराष्ट्राला काळिमा फासणारे

सब टायटल: 
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - राजेसाहेब देशमुख
Maharashtra

.

       अंबाजोगाई (प्रतिनिधी)

     एकीकडे देशात महाराष्ट्राची ओळख एक पुरोगामी राज्य अशी असताना दुसरीकडे मात्र राज्यात समाजस्वास्थ्य बिघडविणाऱ्या नको त्या घटना, प्रकार दररोज कुठे ना कुठे घडत आहेत. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन राज्य केले म्हणूनच त्यांना लोकराजे म्हणतात. पण, त्यांच्याच करवीर नगरीत सामाजिक सलोखा बिघडविण्याचे पाप केले जात आहे आणि तेही केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी, हे अत्यंत निंदनीय, दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. विशाळगड हिंसाचाराचे प्रकरण हे महाराष्ट्राला काळिमा फासणारे आहे, त्यामुळे हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे.

विशाळगड प्रकरणी बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे की, विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नांवाखाली गजापूर गावात एकाच धर्माच्या लोकांवर हल्ले करून त्यांच्या घरांचे, दुकानांचे व मालमत्तांचे प्रचंड नुकसान करण्यात आले आहे. झुंडशाहीचा हा प्रकार महाराष्ट्राला कदापीही शोभणारा नाही, या दंगेखोरांच्या तात्काळ मुसक्या आवळा व कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली आहे. विशाळगड प्रकरणी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांनी ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. अशी माहिती देवून जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र ही साधू-संतांची, थोर पुरूषांची, विचारवंत व समाजसुधारकांची भूमी आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे पुरोगामी राज्य अशी महाराष्ट्राची संबंध देशात ओळख आहे. पण, मागील काही दिवसांपासून आपल्या राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षातील काही नेते हे अत्यंत प्रक्षोभक वक्तव्ये करून राज्यात हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. हे कुठे तरी थांबले पाहिजे, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार अत्यंत घातक व महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणारा आहे, असे देशमुख यांनी सांगितले आहे. विशाळगडावरील अतिक्रमणे काढली पाहिजेत याबाबत कुणाच्याही मनात दुमत नाही. पण, आपले दैवत वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा गड-किल्ल्यांचा वारसा ही आपण जपला पाहिजे. अतिक्रमणाचे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, न्यायालयातील सुनावणी वेळी सरकारी वकील उपस्थित नसतात, सरकार पक्षाकडूनच वेळकाढूपणा केला जात असताना अचानक अशा काही हालचाली करून अतिक्रमणाचा मुद्दा चव्हाट्यावर आणला गेला. विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नांवाखाली १४ तारखेला विशाळगडापासून ४ किलोमीटर दूर असलेल्या गजापूर गावातील एका धर्माच्या लोकांच्या घरांवर हल्ले करण्यात आले, मारहाण करण्यात आली. हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा आहे. विशाळगडावरील अतिक्रमण व गजापूर गावातील दंगल हे दोन्ही वेगळे विषय आहेत, त्यामुळे यापुढे जर पुरोगामी महाराष्ट्र असे प्रकार थांबले नाहीत तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी यावेळी दिला आहे.

गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. 

महाराष्ट्राचे गृहमंत्री ना.फडणवीस यांनी केलेले विधान हे राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वा दंगेखोरांवर कारवाई करण्यासंदर्भातील नसून ते विशिष्ट धर्माला भीती घालण्याचे व या प्रकरणाला वेगळा रंग देणारे आहे असे दिसून येत आहे, गृहमंत्र्यांचे विधान हे एकप्रकारे दंगेखोरांना पाठीशी घालणारे आहे, आम्ही या विधानाचाही निषेध करतो. १४ जुलै रोजी जो हिंसाचार झाला ते सरकार आणि प्रशासनाचे फक्त अपयशच नाही तर प्रशासनाच्या पाठबळाने झालेला गुन्हा आहे. त्यामुळे हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
राजेसाहेब देशमुख
 (अध्यक्ष, बीड जिल्हा काँग्रेस कमेटी.)